[ad_1]
या विजयानंतर ऋतुराज म्हणाला, ‘आमच्यात नेतृत्वाबाबत कुठलीही दीर्घ चर्चा झाली नव्हती. अगदीच औपचारिक बोलणे झाले. आम्ही सराव करीत होतो. धोनी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, की यंदाच्या मोसमात तुला संघाचे नेतृत्व करायचे आहे. बाहेरच्या लोकांना वाटते मला धोनीसारख्या महान खेळाडूची जागा घ्यायची आहे. मात्र, माझी एक वेगळी शैली असणार आहे. २०२२मध्येच धोनीने मला याबाबत कल्पना दिली होती. दोन वर्षांनंतर नेतृत्वासाठी तयार राहण्यास त्याने सांगितले होते. त्यानंतर मी नेहमीच नेतृत्वासाठी तयार होतो. चेन्नई संघाची संस्कृती कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.’ चेन्नई संघव्यवस्थापन नियोजनाबाबत अतिशय काटेकोर आहेत. यामुळेच गेल्या वर्षीपासूनच संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ऋतुराजसोबत क्षेत्ररक्षणातील व्यूहरचना आणि गोलंदाजीतील बदलाबाबत चर्चा करीत होते.
ऋतुराज म्हणाला, ‘माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का नव्हता. लढतीवर नियंत्रण कसे राखायचे, याची मला कल्पना आहे. लढतीचे आकलन करून गोलंदाजीतील बदल कसे करायचे, हे मला माहिती आहे. परिस्थितीनुसार निर्णय कसे घ्यायचे, हेही मला कळते. कारण, याआधी मी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे. नेतृत्वाबाबत मी अगदीच नवखा नाही. एवढेच कशाला, तर गेल्या वर्षी प्रत्येक लढतीनंतर मी प्रशिक्षक फ्लेमिंग यांच्यासोबत लढतीच्या बारकाव्यांबाबत चर्चा करीत होतो. याचा मला नक्कीच फायदा होत आहे.’
कर्णधार म्हणून काय बदल घडवून आणले, असे विचारले असता गायकवाडने चेन्नईची संस्कृती कायम ठेवणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘संघात काही बदल करण्याची गरज नाही. जे चालले आहे, ते उत्तम आहे. चेन्नईची एक पद्धत आहे. त्यानुसारच आम्हाला यश मिळत आहे. अर्थात, मैदानावर कर्णधाराला नक्कीच काही निर्णय घ्यावे लागतात. त्याबाबत मला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्याचा मी आनंद घेत आहे.’
[ad_2]
Source link