[ad_1]

नाशिक : हरिश्चंद्र गडावर फिरायला गेलेल्या सहा पर्यटकांचा ग्रुप पाऊस, दाट धुकं आणि अंधारामुळे वाट चुकला होता. यापैकी एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता चार दिवसांनी त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं आहे. थंडीत कुडकुडून अनिल गीते याचे शरीर कडक झाल्याचे दिसून आले.

तीन ते चार दिवसांपूर्वी असाच एक पर्यटकांचा ग्रुप हरिश्चंद्रगड येथे आला होता. मात्र प्रचंड धुके, वारा पाऊस असल्याने त्यांची वाट चुकली आणि त्यात एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे आता समोर आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडावर पुणे येथील एका पर्यटकांचा ग्रुप एक ऑगस्टला निघाला. यात अनिल उर्फ बाळू नाथराव गीते (वय ३२), अनिल मोहन आंबेकर (वय ३३), गोविंद दत्तात्रय आंबेकर (वय ३५), तुकाराम आसाराम तिपाले (वय ४०), हरिओम विठ्ठल बोरुडे (वय १६) ,महादू जगन भुतेकर (वय ३८) हे सर्व तरुण हरिशचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी आले.

खाजगी वाहनाने पाचनई गावात दुपारी तीन वाजता पोहचले. अंगावर पावसाचे तोकडे कपडे घालून सहाही जण गडाच्या मध्यावर पोहचले. यावेळी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढत हे तरुण पुढे निघाले.

अचानक गडावर मोठ्या प्रमाणात धुकं वाढलं. त्यामुळे समोर असलेली व्यक्ती सुद्धा कोणाला दिसत नव्हती. यानंतर सहाही तरुण जंगलात वाट मिळेल त्या दिशेने जाऊ लागले. धुकं आणि रात्रीचा अंधार असल्याने संपूर्ण रात्र जंगलात गेली. मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क करणेसुद्धा कठीण झाले होते. यामुळे हे तरुण जंगलात आणखीनच भरकटत गेले. अखेर गाईडच्या मदतीने रात्रीच शोध घेत त्यांच्या पर्यंत पोहचले.

सकाळी पाऊस सुरु झाला आणि काही प्रमाणात धुकं कमी झालं. यानंतर मित्रांची शोधाशोध सुरु झाली. तेव्हा जवळच थंडीत कुडकुडून अनिल गीते याचे शरीर कडक झाल्याचे दिसून आले.

यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने सहाही जणांना गडावरून खाली आणण्यात आले. सर्व तरुणांना राजूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र अनिल उर्फ बाळू गीते यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर इतर तरुणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून बाळू गीते यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने वर्षा पर्यटनासाठी अनेक पर्यटक घराबाहेर पडत आहेत. बऱ्याच ठिकाणांचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे बहुतांश पर्यटन स्थळी गर्दी देखील पाहायला मिळत आहे. मात्र अशा ठिकाणी काही दुर्घटनाही घडताना पाहायला मिळत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *