[ad_1]

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केंद्र सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत आहे. ही श्वेतपत्रिका दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली असताना चव्हाण यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. राज्यातील दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटल्यानंतर आता काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरू होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असताना भाजप महाराष्ट्रात ‘गुजरात पॅटर्न’ राबवताना दिसत आहे.

गेल्या २० वर्षांत भाजपनं गुजरातमध्ये आपली पाळमुळं घट्ट रोवली. संघटना विस्तारण्याचं काम जाणीवपूर्वक करण्यात आलं. कधीकाळी काँग्रेसचं गुजरातमध्ये वर्चस्व होतं. आताही काँग्रेस राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. पण गेल्या २ दशकांमध्ये काँग्रेसची ताकद अतिशय कमी झाली आहे. याचा थेट फायदा काँग्रेसला झाला आहे. २००१ मध्ये राज्याचं नेतृत्त्व नरेंद्र मोदींकडे आलं. त्यानंतर पुढील १३ वर्षे राज्याच्या राजकारणात मोदींचा दबदबा राहिला. तेच मुख्यमंत्री होते.

२००२ च्या फेब्रुवारीत गोध्र्यात दंगल झाली. त्यावेळी मोदीच मुख्यमंत्री होते. त्याच वर्षाच्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला आणि सत्ता राखली. यानंतर मोदींनी भाजपवरील पकड आणखी घट्ट केली. २००२ च्या निवडणुकीत भाजपनं १८२ पैकी १२७ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला ५१ जागा जिंकता आल्या. २००७ मध्ये भाजपच्या जागा ११७ वर गेल्या. तर काँग्रेसला ५९ जागा जिंकण्यात यश आलं. २०१२ मध्ये भाजपनं ११५ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसचे ६१ उमेदवार विजयी झाले.

२०१७ मध्ये भाजपला ९९ जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसनं ७७ जागा खिशात घातल्या. ही निवडणूक भाजपसाठी अवघड गेली. २०२२ मध्ये भाजपनं तब्बल १५६ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला केवळ १६ जागा मिळाल्या. गेल्या २० वर्षांमध्ये गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली आहे. या कालावधीत मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपनं काँग्रेसला अधिकाधिक कमकुवत केलं. आता हेच गुजरात मॉडेल महाराष्ट्रात वापरलं जात आहे.

२०१४ च्या आधीपासूनच भविष्याचा अचूक अंदाज बांधून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजप सत्तेत येताच विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला. चौकशांचा ससेमिरा पाठी लागला. भाजप नेत्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच नेते भाजपमध्ये सामील झाले. नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपची वाट धरली. यानंतर त्यांना भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये काहीसा दिलासा मिळाला. जे नेते तुरुंगात जातील असं वाटत होतं, ते भाजपमध्ये गेले. भाजप प्रवेशामुळे या नेत्यांची तुरुंगवारी टळल्याची चर्चा होऊ लागली.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या सहकारी संस्था, बँका, साखर कारखाने आहेत. संस्था, बँका अडचणीत आल्यावर ही नेतेमंडळी अडचणीत येतात हे भाजपच्या लक्षात आलं. यानंतर अनेक नेते भाजपवासी झाले. राज्यात काँग्रेस खिळखिळी करण्यासाठी भाजपनं ‘गुजरात मॉडेल’ वापरलं. आताही तेच सुरू आहे. अशोक चव्हाणांच्या रुपात भाजपनं मराठवाड्यात वर्चस्व असलेला नेता फोडला आहे. चव्हाणांचं त्यांच्या जिल्ह्यात वर्चस्व आहे. मराठवाड्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांचा फायदा भाजपला होईल.

काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तसं झाल्यास गुजरात काँग्रेसप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेस कमजोर होईल. त्याचा फायदा अंतिमत: भाजपला होईल. राज्यातील दोन पक्ष फुटून भाजपसोबत आले आहेत. आता काँग्रेसचे काही आणखी नेते, आमदार फुटल्यास मतदारांसमोर फारसे पर्याय राहणार नाहीत.

२०१७ मध्ये काँग्रेसनं गुजरातमध्ये ७७ जागा जिंकत भाजपला घाम फोडला होता. सत्ता राखताना भाजपची दमछाक झाली होती. पण त्यानंतर भाजपनं विरोधकांना पूर्णत: नेस्तनाबूत करण्यास सुरुवात केली आणि १५० हून अधिक जागा जिंकल्या. विरोधकांकडे नेतेच राहणार नाहीत या दृष्टीनं भाजपनं पावलं टाकली. आता तेच गुजरात मॉडेल भाजपकडून महाराष्ट्रात राबवलं जात आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *