[ad_1]

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एकेकाळी मुंबईच्या रस्त्यावरील गुन्हेगारी, अंडरवर्ल्डचा कणा मोडून काढण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेला बळकटी देण्यात आली होती. या गुन्ह्यांची जागा आता सायबर गुन्ह्यांनी घेतली असून हे गुन्हे रोखण्यासाठी सायबर विभागाला बळकटी दिली जात आहे. मुंबईतील १३ विभागांत अद्ययावत लॅब सुरू होत असतानाच मुंबई पोलिस दलातील २०० पोलिसांना ‘सायबर कमांडो’ म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

देशभरात सर्वाधिक सायबर गुन्हे मुंबईत घडतात. काही वर्षांपूर्वी मुंबईत एकच सायबर पोलिस ठाणे होते. मात्र, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत गेल्याने पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यालयांच्या कक्षेत पाच सायबर पोलिस ठाणी सुरू करण्यात आली. ही सायबर पोलिस ठाणीदेखील कमी पडू लागल्याने प्रत्येक पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सायबर विभाग सुरू करण्यात आले. किरकोळ सायबर गुन्ह्यांसह गंभीर, मोठ्या रकमांच्या गुन्ह्यांचा तपास करताना येथील अधिकाऱ्यांना पुरेशी तांत्रिक मदत वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी स्टेट बँकेच्या मदतीने ‘सायबर शिल्ड’ हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील १३ पोलिस उपायुक्त कार्यालयांच्या कक्षेत १३ ठिकाणी सायबर लॅब सुरू करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत दोनशे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना ‘सायबर कमांडो’ म्हणून संबोधले जाणार आहे. भविष्यात ही संख्या वाढवली जाणार आहे.


हेल्पलाइनचा प्रचार आवश्यक

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. गुन्हे घडल्यानंतर पोलिस तपास करतातच, पण ते घडू नयेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केले. म्हणूनच सायबर गुन्हे रोखण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले. १९३० या हेल्पलाइन क्रमांकाबाबतही अनेकांना अद्याप माहिती नाही. सायबर गुन्ह्यासंदर्भात अशीही एक हेल्पलाइन आहे हे सर्वसामान्यांना कळणे महत्त्वाचे आहे.

पोलिसांनी वाचवले २५ कोटी रुपये

सायबर फसवणूक झाल्यानंतर तक्रार करणे, गुन्हा दाखल करणे या प्रक्रियेत वेळ जातो. या कालावधीत अन्य खात्यामध्ये वळते केलेले पैसे काढून घेतले जातात. आपले पैसे कुणी काढू नयेत यासाठी तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर संपर्क केल्यास पोलिस बँकांच्या सहकार्याने खात्यामधील व्यवहार बंद करतात. गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांनी २५ कोटींहून अधिक रुपये वाचवल्याची माहिती विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.

AC टॉयलेटमध्ये दीड लाखांच्या सामानाची चोरी; CSMT रेल्वे स्थानकावरील सलग ३ दिवसांच्या प्रकारानंतर मध्य रेल्वेला आली जाग

बोधचिन्हाचे अनावरण

सायबर गुन्हे रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘सायबर शिल्ड’ मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, उपायुक्त विशाल ठाकूर, स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. राणा हे उपस्थित होते.

डिपफेक व्हिडीओचा वाढता धोका; सायबर तज्ञांकडून ऐका ‘डीपफेक’च्या धोक्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा…

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *