[ad_1]
दोन मोठे पक्ष फुटून भाजपसोबत गेले. राज्यात महायुतीचं सरकार आहे. केंद्रात भाजपचं बहुमताचं सरकार आहे. पण तरीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी वर्चस्व राखेल, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडिया टुडे ग्रुपनं केलेल्या सर्व्हेतून पुढे आलेली आकडेवारी राज्यातील महायुती सरकारची झोप उडवणारी आहे. शिंदे, अजित पवार गटासह भाजपच्या जागादेखील घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लोकसभेच्या मागील निवडणुकीत शिवसेना, भाजपनं ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत होती. येत्या निवडणुकीत काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४८ पैकी २६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला २२ जागा मिळू शकतात. याचा अर्थ भाजप प्रणित एनडीएला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १९ जागांचं नुकसान होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बडे नेते त्यांच्या गटांना घेऊन महाशक्तीसोबत गेले असताना, त्यांना निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह बहाल केलं असतानाही महायुतीला अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. उलट त्यांची पिछेहाट सुरू आहे.
राज्यात महायुतीला ४० टक्के मतदान होऊ शकतं. तर महाविकास आघाडीला ४५ टक्के मतं मिळण्याचा कयास आहे. भाजपला सर्वाधिक १६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १२ जागा मिळू शकतात. शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटांना १४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच पक्ष आणि चिन्ह गमावूनही ठाकरे आणि थोरले पवार शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट जागा जिंकू शकतात.
[ad_2]
Source link